माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” म्हणत एकांताचा वास निसर्गाच्या सानिध्यात घेताना “आपुलाची वाद आपणासी” अशी स्वःतच्या अंतर्मनास साद घालणारे तुकोब्बा राय असो किंवा सह्याद्रीच्या कड्याकपा-यांतुन वाहणा-या जलप्रपातांच्या घळयांतुन साधना करणारे समर्थ रामदास असोत, किंबहुना सगळ्याच संत महंतांस या सह्याद्रीने, या निसर्गाने आकर्षित केलेले आपणास दिसते आहे.