अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला (६ मार्च १६७३). सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च १६७३) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर याने खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव ठार झाला.
मोगल सरदार दिलेरखान आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांनी युती करून मराठ्यांवर चाल केली; पण या युतीला न जुमानता बहलोलखानाचा मराठ्यांनी दणदणीत पराजय केला. मराठ्यांनी संपगाव, लक्ष्मेश्वर, बंकापूर, हुबळी इ. स्थळे लुटली. महाराजांनी कोकणात मोगल आणि सिद्दी यांचा आरमारी युद्धात पराजय केला; पण सिद्दींचा सरदार सुंबुल याच्याबरोबर मराठ्यांचा आरमारी अधिकारी दौलतखान हाही जखमी झाला.
इंग्रजांनी सिद्दी आणि महाराज यांत मध्यस्थी करण्याच प्रयत्न केला; परंतु सिद्दी आरमाराला इंग्रज मुंबईत आश्रय देतात, या सबबीवर ही मध्यस्थी शिवाजी महाराजांनी झिडकारली. इंग्रजांची मुख्य गाऱ्हाणी म्हणजे राजापूर आणि इतर स्थळांतील वखारींच्या लुटीबद्दल भरपाई मागण्यासंबंधी होती. मराठ्यांच्या हाती जंजिरा पडू नये, ही इंग्रजांची इच्छा असूनही, व्यापार-उदीम, जकात आणि मुक्त संचार यांसाठी मराठ्यांशी मिळते घेण्याचे धोरण त्यांना स्वीकारावे लागले. अखेर वाटाघाटी होऊन इंग्रज आणि महाराज यांच्यात तह करण्याचे ठरले (१६७४).
Comments
Post a Comment