Skip to main content

लाहोरमध्ये मराठ्यांचा जरीपटका ध्वज फडकविणारे पराक्रमी वीर..!


स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठ्यांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे.
अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठ्यांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठ्यांनी सर केली व मराठा फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठा सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठा फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठा जरीपटका ध्वज फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठा फौजेत यावेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व मानाजी पायगुडे यांनी केले. बिपाशा नदी तीरावरून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना झाल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. अटकेच्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रांतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे.
३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते.
४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’
५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्या किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्ल्याचा पाडाव झाला.
६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रांतात घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रांतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’
७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी.
८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला.
९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती.
पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाड्यात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारी-शेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कब्जा मिळविला. मराठा फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठा फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे मराठा साम्राज्यातील अत्यंत विश्वासू सरदार होते.
त्यांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठ्यांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठ्यांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे.
#वीर_मानाजी_पायगुडे व अन्य सर्व मराठा सेनानींना मानाचा मुजरा__/\__
Image may contain: 1 person, standing

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...