राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली.
बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला (मे १६७५). या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १६७५ मध्ये पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. पठाणांचे बंड मोडावे आणि मराठ्यांना प्रतिकार करावा असे ठरले; पण पठाण खवळले आणि खवासखान हा विजापूरला येताच त्यांनी त्याला कैदेत टाकले (११ नोव्हेंबर १६७५). तेव्हा दक्षिणी मुसलमान सरदार शेख मिन्हाज याने बहलोलखानाचा पठाण सरदार खिज्रखानाला ठार मारले. त्याचा सूड म्हणून पठाणांनी खवासखान यास ठार मारले (१८ जानेवारी १६७६). परिणामतः दक्षिणी मुसलमान आणि पठाण यांच्यात शाह डोंगर मुक्कामी प्रखर युद्ध होऊन दक्षिणी पक्षाचा मोड झाला (२१ मार्च १६७६).
शेख मिन्हाज आणि दक्षिणी सरदार यांनी गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाची मदत मागितली. विजापूरची सूत्रे बहलोलखानाकडे आली. औरंगजेब पंजाबातून २७ मार्च १६७६ रोजी दिल्लीला परत आला. त्याने विजापूरच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बहादुरखानास विजापूरवर स्वारी करण्याची आज्ञा दिली आणि दिलेरखानास दक्षिणेत रवाना केले (जून १६७६). दिलेरखानाबरोबर नेताजी पालकरलाही दक्षिणेत पाठविले. नेताजीला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता. दक्षिणेत येताच त्याने संधी साधून दिलेरखानाची छावणी सोडली आणि तो महाराजांकडे आला. त्याचे शुध्दीकरण करून महाराजांनी त्याला हिंदू केले (१९ जून १६७६).
जानेवारी-फेब्रुवारी १६७६ दरम्यान शिवाजी महाराज सातारला आजारी होते, तत्संबंधी अनेक अफवा प्रसृत झाल्या. संभाजी आणि सावत्र आई सोयराबाई यांचे परस्परसंबंध चिघळत असल्याची वदंता होती. संभाजींच्या वर्तनाविषयीच्या बातम्यांत काही अंशी वदंताही असावी; पण शिवाजी महाराजांनी शांतपणे या सर्व बाबी हाताळल्या. विजापूरविरुध्द मोगलांनी चालविलेली तयारी ते बारकाईने पहात होते. विजापूर राज्यातील अथणी, संपगाव इ. भागांतही ते स्वतः आक्रमणे करीत होते. मोगल सुभेदार बहादुरखान याने भीमा ओलांडून विजापूरवर चाल केली (३१ मे १६७६). विजापूरजवळील इंडी येथील युद्धात मोगलांची दैना उडाली (१३ जून १६७६). त्यात मोगल सरदार इस्लामखान रुमी मुलांसह ठार झाला. मोठ्या कष्टाने मोगलांनी माघार घेतली आणि नळदुर्ग किल्ल्याला वेढा घातला. बहलोलखानाने तो उठविला त्यात बहादुरखानाचाच मुलगा मोहसीन मारला गेला (ऑगस्ट १६७६). तेव्हा त्याने विजापूरचे दक्षिणी सरदार शेख मिन्हाज, सिद्दी मसूद, शेख जुनैदी यांना पुन्हा एकत्र आणले आणि विजापूरच्या पाडावासाठी महाराजांच्या मदतीची अपेक्षा धरली. महाराजांनी या संधीचा पूर्ण लाभ उठविला. त्यामुळे मराठ्यांना दक्षिण भारतात मोठे आश्रयस्थान निर्माण झाले.
Comments
Post a Comment