Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २१

*रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!*
स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा
विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला। शत्रूच्या हातून
घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य
कृतींचा महाराज नेमका फायदा
उठवीत असत. महाराजांची
लष्करी प्रतिभा , म्हणजेच
गनिमी काव्यातील काचकता
विलक्षण चपळ होती. हे
मराठी कोल्हे कोणचा डाव
टाकतील अन् केव्हा टाकतील
याचा अंदाजही शाही
सेनापतींना येत नव्हता.
प्रतापगडच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश
मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार
आहे असे अंदाज नव्हे खात्रीच साऱ्यांना
वाटत होती। त्यात इंग्रज आणि
पोर्तुगीजही होते. खुद्द
विजापूरच्या आदिलशाहला तर विजयाबद्दल शंकाच
उरली नव्हती. जिवंत किंवा
मेलेला सीवा विजापुरात केव्हा दाखल होतो
याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच.
पराभव! शिवाजीची चढाई थेट
पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर
थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार
नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई
पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि
रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या
हाताखाली फाझलखान यांना मोठ्या
फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने
पाठविले. ही फौज नेमकी
किती होती हे समजत
नाही. पण पाच हजारांहून
नक्कीच अधिक होती.
ही शाही फौज येत आहे
याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि
नेताजी पालकरास समजल्या.
ही फौज दि. २८ डिसेंबर १६५९ या
दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर
अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक
पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली.
महाराज आणि नेताजी हेही
वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले.
आधीच्या अफझल पराभावाने सारा
आत्मविश्वास गमावून बसलेली
ही फौज धीर धरूच
शकली नाही. महाराज या
फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच
उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग
बाकीच्या फौजेलाही पळण्याचा
धीर आला. या लढाईला
कोल्हापूरची लढाई असे म्हणतात. पण
हिला लढाईच म्हणता येईल का ? फारतर झटापट किंवा
चकमक म्हणावे लागेल. पूर्ण पराभूत होऊन (न
लढताच) शाही फौज सुसाट
पळाली. महाराज तिचा पाठलाग
करीत होते. पण त्यांनी
पाठलागही थांबविला अन्
नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला
वेढा घातला. किल्ला खूप मोठा होता. भोवती
खंदक होता. पुन्हा इथं प्रश्ान् आलाच.
मराठी सैन्याला तोफखाना नव्हता. अन्य
हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे
प्रयत्न सुरू होते. महाराज स्वत: उभे होते.
इथे एक गोष्ट लक्षात येते की , वेढा घालून
दीर्घकाळ युद्ध करणे मराठी
फौजेला परवडणारे नव्हते। कधीच परवडले
नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट
ठाणी काबीज
करण्यासाठी महाराजांनी फक्त
दोनदाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा
इ. १६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा
वेढा. पहिला जमला नाही , दुसरा म्हणजे
वेल्लोरचा जमला. पण तो भुईकोट जिंकायला १४ महिने
लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं.
कमी माणूसबळ आणि कमी
साहित्य यांमुळे सपाटीच्या
प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं ,
वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या
भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं
ठेवणं अवघड होतं. गरिबी! काय करणार ?
म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी
भौगोलिक विचार , नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा
विस्तार सह्यादीच्या आणि समुदाच्या
आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी
ठरला. कोकणातील परकीय
इंग्रजी , फिरंगी आणि
हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे
याकरिता त्यांनी प्रयत्नांची
शिकस्त केली. थोडेफार यशही
मिळविले. पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या
कमतरतेमुळे त्यांना यशही
कमी मिळाले. पण प्रयत्न
कधीही थांबविले
नाहीत. आमच्याच माणसांनी
जर महाराजांना मदत केली
असती , तर मराठी सत्ता
उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण
दिल्लीपर्यंत पोहोचली
असती. महाराजांना सामील
होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत
छत्रसाल उभा राहिला. बाकीसारे निरनिराळ्या
बादशाहाचं इमानेइतबारे गुलामगिरीच
करीत राहिले.
एक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे।
महाराष्ट्राची मुंबई
पोर्तुगीजांच्या ताब्यात होती.
पोर्तुगीज आणि इंग्लिश
राजघराण्यातील एक लग्नसंबंधात
पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला
आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे
ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात
मुंबईत असलेले पोर्तुगीज
अधिकारी मंुबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास
टाळाटाळ , चालढकल करू लागले.
पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई
सोडायची नव्हती. (पुढे इ. स.
१९६१ मध्ये गोवा तरी कुठं
सोडायची इच्छा होती!) त्यानंतर
मिळेल तेवढा भारत गिळायची भूक
लागली होती.
आम्ही मंडळी उदार.
कोणाकोणाला आमची भूक
लागली आहे , हे टिपण्यासाठी
आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो.
अजूनही! पोर्तुगीज मुंबईचा
ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ
व्यापारासाठी ईस्ट इंडिया
कंपनीच्या नावाने इंग्रजांची
मंडळी सुरत , कलकत्ता , मदास
इत्यादी ठिकाणी
वखारी घालून बसली
होती. सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा
इंग्रज वखारीचा प्रमुख होता.
आता पाहा हं काय झालं ते! मुंबईतल्या आमच्याच
अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला
इंग्रजी जॉर्जकडे पत्रे
पाठविली। किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले
की , हे इंग्रजांना , तुम्ही
लौकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हांस
आमच्याकडून शक्य ती मदत करू.
पाहिलंत ? आमच्या मंडळींना सुरतेतले
इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात. मायबाप
वाटतात. त्यांना पोर्तुगीजांचे जागी
इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण
शेजारीच कल्याण , भिवंडी ,
अलिबागपासून कुडाळ , ओरसपर्यंत स्वराज्य थाटून
बसलेला , अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना
उडविणारा , घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं
स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत
नाही. मुंबई घ्या , मुंबई
आपली आहे , आम्ही
तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत
नाही. आमची ही
जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके
समजतो.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...